Tuesday 11 December 2007

भरतीला आलेल्या सागरात
शिंपल्यातील मोती..
शोधतांना...
डोळ्यांच्या ओलसर कडा
सुकवायला खारा वारा
कमी पडतो तेव्हा
कोमेजलेल्या स्वप्नांना
उराशी कवटाळुन
दोन मुक हुंदक्यांचे
शिंपण घालते,
कधी वाटते त्या भरतीस
करावे नखशिखांत समर्पण,
जावे खोल खोल
त्या गडद अंधार्‍या पाण्याच्या
गर्भात बुडुन
सोडुन द्यावे अस्तीत्वाशी लढणे
पण..
परत भानावर येउन शोधत राहते किनारा...
मिसळत रक्तात ते खारे पाणी...
मातीमोल

माझ्या मातीचा राजा,
नाही त्याच्या कष्टाचा गाजावाजा..
माखली चिंब माय..
त्याच्या रक्ताने,
राजकारण करतो..
त्याचे आम्ही सरावाने!
पोट चिकटले पाठीला..
नाही निसर्ग साथीला..
दोन थेंबासाठी
जीव डोळ्यात झाला गोळा..
तुच सांग देवाजी..,
सोनं पिकवणारा लेक तुझा,
सार्‍या दुनियेत अनमोल..
का ठरला मातीमोल...
का ठरला मातीमोल..!!!
बळीराजा

थेंबा थेंबा साठी
आसुसलेली धरती..
उधी लागलेला
आंबा बांधावरती...,
नजरेच्या टप्प्यात....
नाही कुठे हिरवा सडा..,
फ़क्त कोरड्या मातीचा
मुक तडा...!
पोटच्या पोराचा
घास झाला बियाणे..
रिकाम्या खळ्यात.
गुरांचे कोरड्याने चरणे..
आतुरलेली गिधाडे
आणि काही डोमकावळे..
त्याखाली भिरभिरताहेत
बळिराजाचे चैतन्य
हरवलेले डोळे..!!!
रोज रात्री स्वप्नांचा महाल अवतरतो,
आणि रोज कोसळुन पडतो...
सारे बोचरे तुकडे ते गोळा करते..
हिरवे,निळे, लाल, पिवळे.. आणि चंदेरी
उद्याच्या आशेचे बिलोरी,
सारे असतात काटेरी...
टोचणारे दातेरी!
असे आयुष्याचे झरझर दिवस सरतात,
माझ्यावर जगल्याचे उपकार करतात..
प्रत्येक दिवस माथ्यावर येतो,
उद्या काय म्हणुन त्रास देतो..
प्रत्येक वळणावर ध्येय..
गाठल्याचा भास होतो,
आणि पुढे अजुन न संपणारा रस्ता दिसतो...
न संपणारा रस्ता दिसतो...
वार्‍यासोबत शिळ येते,
गातो पक्षी त्याचीच गाणी..
झुळझुळणारे पाणीसुध्दा बोलते त्याचीच वाणी!
वहाता वहाता ढगही दाखवुन जातो त्याचा चेहरा...
हसते फ़ुल खळी पाडुन... सांगते त्याचीच कहाणी,
माझ्या मनातले हसु ओठावर येते,
फ़ांदीवरची मैना मग धारेवर घेते..,
कधी येणार कधी येणार म्हणुन धिंगाणा घालते
हळुच स्पर्शतो तो घमघमाट मोहराचा,
कुणाचा राग कुणाचा लोभ..
सारे जीवनाचे भोग,
सोडुन द्या सारे
अरे...
वसंत आला रे....!!!